Header Ads Widget

Responsive Advertisement

शिवकालीन पत्रे समजून घेताना

शिवरायांच्या काळातील अथवा त्यानंतर ची पत्रे वाचताना तत्कालीन समाजव्यवस्था तर समजतेच पण त्याबरोबर त्याकाळी वापरली जाणारी भाषा आणि त्या अनुषंगाने केलेली शब्दांची योजना आपणाला खिन्न करून सोडतात. ऐतिहासिक पत्रं म्हटलं की मोडी आणि फारसी यांची माहिती असणे जरुरी आहे. जितकी व्यवस्थित पत्रे मोडी लिपीतील असतात तितकी फारसी पत्रे दिसत नाहीत.



मोडी लिपी आणि पत्रे याविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

या पत्रांचा अभ्यास करताना इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे म्हणतात


नवीन विचारमालिका रूढ करणारे पुरुषश्रेष्ठ अगदी विरळाच सापडतात. भूतकालच्या अनुभवाच्या पायावर विचारसरणीची इमारत चढविणे मात्र तितकें दुःसाध्य नसतं. म्हणून मनुष्यप्राणी प्रथम या भूतकालीन ज्ञानाची अपेक्षा करतो व या ज्ञानाच्या साहाय्याने तो आपल्या विचारांत भर टाकून आचारांची दिशा ठरवीत असतो. ज्ञानसंवर्धनाला व त्याबरोबर देशाच्या अगर समाजाच्या प्रगतीला हा भूतकालीन अनुभवाचा अथांग ज्ञानसागर मंथन करणे इष्ट असते म्हणून सामान्य कर्ती माणसें या ज्ञानसागरांतील निधि बाहेर काढण्याच्या खटपटीला लागलेली दिसतात.
- साधन चकित्सा प्रस्तावना खंड

आजरोजी आपण फक्त स. न. वि. वि. इतकाच मायना लिहतो पण ऐतिहासिक पत्रात तो श्रियासह विराजित अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री ..... साहेब असा होतो. जिथं मायना लिहताना इतका आदर दिला आहे तिथे इतर गोष्टीत किती खबरदारी घेतली असेल? ज्यावेळी या ऐतिहासिक पत्रांचा आढावा आपण घेतो त्यावेळी असं लक्षात येतं की ही पत्रे ठराविक एका पद्धतीने लिहलेले आहेत. पत्र कुणाला लिहीत आहोत याची जाणीव ठेवून मायना वापरला जातो तसेच त्या व्यक्तीला योग्य तो आदर देण्यासाठी अनेक योजना या पत्रात असतात. व्यावहारिक आणि वैयक्तिक असे आज जे पत्रांचे मुख्य प्रकार आहेत ते त्याकाळी देखील होते हे समजते.
शिवकालीन पत्रात प्रामुख्याने खालील गोष्टींची काळजी घेतलेली आपणाला दिसते.

१) श्रीकार
२) शिक्का
३) कालगणना
४) मायना
५) मुख्य मजकूर
६) समाप्ती मुद्रा

वर उल्लेखित मुद्दे कुठे आणि कोणत्या स्वरूपात वापरायचे याचे नियम ठरलेले असून त्याविषयी सविस्तर माहिती पुढे घेऊ.

शिवकाळात पत्र नक्की कोणत्या कारणास्तव लिहिले त्यावरून त्याचे ८४ प्रकार पडतात ते येथे जाणून घ्या

श्रीकार

पत्राच्या सुरवातीला आपले आराध्य दैवतेचे नाव लिहले जाते अथवा ''श्री" हा शब्द लिहला जातो. शिवरायांच्या बहुतेक पत्रात श्री येतो तर कधी 'श्री शंकर', 'श्री तुळजाभवानी', 'श्री भवानी शंकर', 'श्री शंकर प्रसन्न', 'श्री ज्ञानदेव' असे श्रीकार येतात. अजून एक महत्वाचा मुद्दा येथे लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे श्रीकार लिहिताना दिसून येतो तो आदरभाव. एखाद्या पूज्य व्यक्तीला पत्र लिहिताना योग्य तो आदर देण्यासाठी त्या व्यक्तीचे नाव पत्राच्या सुरवातीला एकदाच लिहिले जाते आणि जिथे जिथे त्या व्यक्तीच्या नावाची पुनरावृत्ती होईल तिथे तिथे जागा रिकामी ठेवली जाते. मोरया गोसावी अथवा समर्थ रामदासांना लिहलेल्या पत्रात या गोष्टी आपण पाहू शकतो. आदरभाव दाखविण्याच्या अशा अजून पद्धती पुढे देखील आपण पाहणार आहोत.

लेख कितपत महत्वाचा आहे यावरून त्यावर अजूनही काही अक्षर लिहिली जातात. जसं की एखादे पत्र किंवा महजर जास्त पानांचा असेल तर त्या पांनांची संख्या नमूद केली जाते. समजा एखादा महजर १० पानांचा असेल तर त्यावर १\१० लिहलेले असते तसेच एखाद्या महजराचे ४ वेगवेगळे भाग असतील तर ४\१ लिहलेले दिसते.

ऐतिहासिक पत्रातील रेघांचे देखील असतात प्रकार | जाणून घ्या त्यांची नावे आणि वापरण्याच्या पद्धती

शिक्का

पत्राचे अथवा संबंधित कागदाचे महत्व काय आहे ते जाणून त्यावर शिक्का उठवला जात असे. थोडक्यात खूपच महत्वाचे पत्र असेल तर त्यावर छत्रपतींचा शिक्का असतो अथवा प्रधानांच्या शिक्क्याने काम होऊन जाते. पत्राच्या सुरवातीला मारला जातो तो मुख्य शिक्का तर पत्राच्या शेवटी उठवली जाते ती समाप्ती मुद्रा. एखादे पत्र मोठे असेल व त्यासाठी अनेक कागद वापरले असतील थोडक्यात महजर चे कागद यावर ते कागद जिथे जिथे जोडले जातात त्या त्या जोडावर देखील शिक्का मारला जातो जेणेकरून कुणीही मधले कागद बदलून आपला इच्छित मजकूर लिहणार नाही. मुख्य शिक्का पत्राच्या सुरवातीला श्रीकाराच्या खाली अथवा पत्रात दोन ते तीन ओळींनंतर उठवला जातो. आजरोजी काही ठराविक च पत्र उपलब्ध आहेत ज्यावर शिवरायांची मुद्रा आहे. बाकी सर्व पत्रे शिवरायांच्या नावाने दफ्तरातून निघाली आहेत मात्र त्यावर प्रधानांची मुद्रा पाहायला मिळते. पत्राच्या शेवट मात्र समाप्ती मुद्रेने होतो ज्यामध्ये खालील प्रमाणे लेख असतात

१) लेखनालंकार
२) मर्यादेय विराजते
३) लेखनसीमा
४) लेखनाधिकार



कधी कधी पत्राच्या शेवटी खाशांच्या हस्ताक्षराने पत्राचा शेवट होतो म्हणजेच संपूर्ण पात्र कारकून लिहतात मात्र पत्राच्या शेवटी एखादा शब्द अथवा वाक्य पाठविनारी व्यक्ती लिहते आणि पत्राचा शेवट होतो. यामुळे किंवा मर्यादा मुद्रेमुळे पत्र पाठविल्यानंतर कोणतेही बदल केले जाण्याची शक्यता कमी होते.

काही महत्वाच्या बाबी
कोणते काम कोणी करावे याविषयी शिवरायांनी जाबता करून दिला. याचा विचार केला तर राज पत्रावर शिक्का मोर्तब करायचा अधिकार मुख्य प्रधान यांचा असे.

मुख्य प्रधान यांनी सर्व राजकार्य करावे. राजपत्रांवरी शिक्का करावा.

या जाबत्यात कोणत्या प्रसंगानुसार कोणी शिक्का मोर्तब करावा याचे अनेक उल्लेख आहेत.
आधी मोर्तब उठवण्याचा जो क्रम दिला आहे तो काही ठिकाणी बदलेला दिसतो. एखाद्या विद्वान, मानाने मोठ्या व्यक्तीला पत्र लिहतांना आपल्या नावाचा शिक्का त्या पानावर शेवटी अथवा पत्राच्या शेवटी मारला जातो. यावरून एखाद्या प्रती आदर व्यक्त करण्याची भावना दिसून येते.

कालगणना
ऐतिहासिक पत्र म्हटलं की सगळ्यात आधी ठरतो तो त्याचा काळ? पत्र नक्की कोणत्या वर्षीचे आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. काही ठिकाणी खोटी पत्रे बघायला मिळतात ज्यांची पारख फक्त त्यावरील तारीख बघून होते. मुस्लिम राजसत्तेपूर्वी हिंदुस्थानात संवत्सर, शक, तिथी, माह अशी हिंदू कालगणना वापरली जात होती
पूर्वी वापरली जाणारी हिंदू कालगणना काळाच्या ओघात पडद्याआड झाली आणि तिची जागा मुस्लिम कालगणनेने घेतली. त्यात परत तिचे अनेक प्रकार पडेल जसे जुलूस, फसली, सूहूर सन इत्यादी.

मायना

मायना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो स.न.वि.वी. ( सप्रेम नमस्कार विनंती विशेष). पण पूर्वी इतके साधे मायने नव्हते. पत्रातील मायने वाचून पत्राचे वजन लक्षात येते. कोणता मायना कोणासाठी, स्त्रियांसाठी काय मायना असावा, त्यात ती स्त्री लग्न झालेली असेल तर काय लिहावे किंवा पुरुषासाठी असेल तर त्याचे वय, हुद्दा लक्षात घेतला जात.
शिवराय सुरवातीला मुस्लिम पद्धतीने मायना लिहीत म्हणजे

अजरख्तखाने शिवाजी राजे दामदौलतहू बजानेब कारकुनानी हवालदारानी हाल व इस्तकबिल

अर्थात, शिवाजी राजे यांच्या कचेरीतून हे पत्र सध्या आहेत व इथून पुढे असतील अशा कारकून व हवालदार यांसाठी आहे. राज्यभिषेकानंतर मात्र ही पद्धत बदलून शिवरायांनी हिंदू पद्धतीने कालगणना सुरू केली. त्यानंतर मायने पुढीलप्रमाणे सुरू झाले.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके  ( चालू राज्याभिषेक शक, संवत्सर, माह, तिथी, वार)

कित्येक वर्षांनंतर पत्रावर हिंदू कालगणना वापरण्याचे धाडस उरी बाळगणारे छत्रपती शिवराय हे एकमेव राजे झाले.
राज्याभिषेक विषयी सविस्तर वाचा

मराठ्यांच्या सत्तेच्या उत्कर्ष मध्ये न्यायमूर्ती रानडे म्हणतात
शिवाजीने पत्रांचे मायने देखील अशाच पद्धतीने सुधारले
स्त्रियांच्या बाबतीत देखील तितकाच आदर ठेवला जात. पत्राच्या मायन्यात स्त्रियांना आई अथवा बहिण असे संबोधून लिहले जाई. 
सकल सौभाग्यवती वज्र चुडेमंडित
सौभाग्यवती मातोश्री
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब
 असे काही मायने स्त्रियांना उद्देशित दिसतात.


मुख्य मजकूर
'पत्र लिहण्यास कारण की ' या वाक्याने आजकाल पत्रांची सुरवात होते यापेक्षा वेगळी आणि विविधतापूर्ण सुरवात पूर्वी केली जात. यावरून नक्की कोणती घटना घडली किंवा पत्राचे कारण लगेच उघड होत.
जसं की
ऐसी खबर कळो आली की...
तुम्ही पात्र पाठवले ते उत्तम समयी पावले...
तुम्ही पत्र पाठविले ते आसीर्वादपूर्वक वाचन लिहिली ते कलोन समाधान जाले...
तुमचे बाबे हुजुर खबर मालुम जाली जे...
हूजुर येऊनु मालुम केले जे...

यानंतर मुख्य गद्य सुरू होतो. शिवरायांची पत्रे त्यातील भाषा आणि शब्द योजना यांचा अभ्यास केला तर पत्राची जरब समजून येते. वेळोवेळी सरदारांची केलेली कानउघाडणी असो किंवा प्रेमाने सांगितलेले चार शब्द यातून शिवरायांचे विचार नक्कीच प्रकट होतात. इतकं असून देखील शिवरायांचं हस्ताक्षर आज पर्यंत इतिहासाला माहीत नाही ही खरी शोकांतिका. शिवरायांनी वापरलेली वाक्ये आजदेखील तितकीच जरब देणारी वाटतात. जसं की शिवरायांनी त्यांचे बंधू व्यंकोजी ला लिहलेले पत्रात ते म्हणतात
रिकामें बसून, लोकहाती नाचीज खाववून, काळ व्यर्थ न गमावणे, कार्यप्रयोजनाचे दिवस हे आहेती, वैराग्य उत्तरवयी कराल, ते थोडे आजही उद्योग करून आम्हांसी (पराक्रमाचे) तमासे दाखविणे.

१३ मे १६५९ च्या पत्रात शिवरायांनी बाजी प्रभूला एक पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी किल्ल्याच्या डागडुजी विषयी काही सूचना केल्या आहेत जेणेकरून गडाचे काम मजबूत होईल. त्यासाठी पिलाजी भोसले सोबत २५ लोक देऊन कामकाज कसे करावे याविषयी सविस्तर लिहिले आहे.
.... हवालदारास घर व लोकास अळंगा मजबूत करूनु देणे. घर व अळंगा करूनु द्याल त्या पावसाने आजार न पावे ऐसा करूनु देणे. नाही तरी सजवज करूनु द्याल...

यात घरे कशी बांधावी हे सांगितले तर आहेच पण वरून एक चपराक पण मारली आहे जेणेकरून त्या कामात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही. मजूर घरे बांधतील पण फक्त सजवज म्हणजे दिखावा म्हणून आणि ती मजबूत होणार नाहीत, पावसात ती टिकणार नाहीत.

समाप्ती मुद्रा
पत्राची सुरवात इतकी मस्त असते तर शेवट देखील तितकाच वैशिष्ट्य पूर्ण असावा. शेवट कसा करावा याचे देखील तंत्र पूर्वी ठरलेले होते. यासाठी काही ठराविक शिक्के असतं यांना 'मर्यादा मुद्रा' किंवा 'मोर्तब' म्हणत. यावर कोरलेली अक्षरे ठरलेली होती. पत्राचा शेवट जेथे करावयाचा तेथे शेवटच्या शब्दाला अगदी चिकटून हे शिकले मारले जात जेणेकरून पत्रातील मजकुराशी कुणी छेडछाड नाही करणार. या शिक्क्यातील मजकूर खालील प्रमाणे असतात.

मर्या देयं विराजते
लेखनसीमा
इतिमर्यादा
इत्यलम
पत्रावधिरंय भाती



अजून एक महत्वाची गोष्ट इथे नमूद करावी वाटते. या शिक्यांच्या आधी किंवा शिक्क्या ऐवजी काही वाक्ये आढळतात. आता ही वाक्ये काही ठिकाणी खाश्याच्या हस्ताक्षरात देखील दिसतात. म्हणजे संपूर्ण पत्र त्या व्यक्तीचा लेखनिक लिहतो पण त्याचा शेवट मालक करतो. मुख्य व्यक्ती पत्राचा शेवट करताना पत्र वाचून मग शेवटी एक वाक्य लिहितो आणि त्यापुढे मग मोर्तब केली जाते. शिवरायांच्या पत्रात अशी वाक्ये आढळतात. इतर मजकूर आणि पत्र समाप्तीची ओळ काही ठिकाणी वेगळी दिसते पण ती नक्की शिवरायांनी लिहिली का? यावर प्रश्नचिन्ह उभे राहते कारण शिवरायांची जेमतेम पत्र उपलब्ध आहेत ज्यातून शिवरायांचं हस्ताक्षर नेमक कोणतं हे समजणे अवघड आहे. पत्राचा शेवट करण्यासाठी शिवरायांच्या पत्रात आलेली काही वाक्ये खालील प्रमाणे

जाणिजे
बहुत काय लिहिणे
कौल असे
हे बरे म्हणून वर्तणूक करणे
बहुत लिहिणे नलगे
कोणे गोष्टी चिंता न करणे
उजुर न करणे
एक जरियाची तसविस न देणे
ताकीद असे
हे बरे म्हणून वर्तणूक करणे
ऐसे समजून वर्तणूक करणे

छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर पत्र समाप्तीची वाक्ये जसे की 'सुज्ञ असा', 'लेखनालंकार', 'सुज्ञ असा' स्वतःच्या हस्ताक्षरात लिहले जात.
अशा प्रकारे शिवरायांच्या काळी पत्रे कशी होती याचा थोडा विचार येथे केला आहे. शिवरायांचे एक एक पत्र अभ्यासायचे म्हटले तर त्यावर प्रबंध होतील इतके गहन अर्थ त्याचे होतात. त्यामुळे इथे फक्त काही महत्वाचे मुद्दे, पत्रे घेऊन आणि काही ठराविक बाबींचा विचार करून  उहापोह केला आहे.


कृपया काही सूचना असतील तर कमेंट मध्ये लिहावे जेणेकरून update करता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. मुद्रा/शिक्का याचा आकार हुद्द्या नुसार असे का?
    जसे की राजा (शिवाजी महाराज)=अष्टकोनी
    देशमुख/देशपांडे=वाटोळा(गोल)

    उत्तर द्याहटवा

Thanks for Comment and suggestions